★दिवाळी सप्ताह भाग : ०१


★ वसुबारस आणि धनत्रयोदशी 
             
                 लेखन : ओंकार जगदेव वाडकर

               दिनदीन दिनदीन दिवाळी, बहीण भावाला ओवाळी अशी आपसूकच छोटीशी आरोळी आपल्या ओठांवर येऊन जाते. यात आठवतात ते आपले पहिली साजरी झालेली बालपणातील दिवाळी. तो दारासमोर रंगीबेरंगी कंदील अन् पणत्यांची रोषणाई ती अंगणातली दाट रांगोळी. या सर्व सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आजू बाजूला पसरवत असतो. या दिवसांमध्ये आपण पूर्ण त्या अंनदात झोकून देतो. वसू बारस हा दिवाळी सणातला पहिला दिवस ज्या दिवशी गो मातेची पूजा केली जाते. गोमाता लक्ष्मी परी मानून तीच दर्शन घेतलं जातं. आणि तिच्या छोट्याश्या जीवाची देखील पूजा केली जाते आणि ज्यांच्या घरी गाई गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी मोठा गोडधोडाचा बेत असतो. सायंकाळी गोमातेच्या चरणांना पाण्यानं धुवून त्यावर हळद पिंजर घालून पूजा केली जाते आणि नैवैद्य दाखविला जातो.
                      आजचा आपला या सणातला दुसरा दिवस म्हणजे ‘ धनत्रयोदशी '  हा सण सर्वत्र मोठ्या मनानं आनंदाने साजरा केला जातो. देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म आज दिवशी झाला. काही लोक लक्ष्मी मातेची ही पूजा करतात आज दिशी दिवाळी सणातले एक आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळते. व्यापारी वर्गात आजच्या सणाला मोठे महत्त्व आहे सायंकाळी पूजा करुन देवापुढे दिवा लाऊन नतमस्तक होऊन दुकानाची धनाची पूजा करतात. सर्व सामान्य माणूस शेतकरी सुद्धा आपण पिकविलेल्या सोन्या परी धन धान्याचं पूजन करतो अन् आनंद साजरा करतो. विशेषतः व्यापार वर्गात नव्या हिशेब वह्या वापरात आणण्याचा एक प्रघात आहे.
                       किती सुंदर वाटतं ना जेव्हा दाराच्या चौकटीला तोरणं बांधून सगळीकडे रोषणाई पसरते. आज मुख्यत्त्वे धनाची कुबेराची पूजा केली जाते. या सणामागे वेगळी अशी पौराणिक कथा आहे. एका कथित भविष्यवाणी प्रमाणे होम राजाचा मुलगा सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. पण त्या आधी राजा आणि राणी दोघे ही त्याचं लग्न लाऊन देऊन संसार मांडण्याचा बेत आखतात. लग्न लाऊन दिले जाते आणि लग्नानंतरचा हा चौथा दिवस असतो जो आधीच कथित केल्याप्रमाणे घडणार असत. जेव्हा राजकुमाराची पत्नीला हे कळतं तेव्हा ती त्याला त्या दिवशी झोपू देत नाही त्यांच्या अवतीभोवती सोन्याच्या मोहरा ठेवल्या जातात आणि दिव्यांची रांग लाऊन सर्वत्र रोषणाई पसरवली. जेव्हा सर्परुपी यम महालात प्रवेश केला तेव्हा त्याचे डोळे त्या प्रकशान चमकून गेले आणि नाईलाजानं त्याला आपल्या यमलोकी परतावे लागले.अशा रीतीने तीन आपल्या पतीचे प्राण वाचवले.
                        ज्यावेळी असुरांना समवेत घेवून देव इंद्र यांनी समुद्र मंथन केले तेव्हा लक्ष्मी देवू प्रगट झाली आणि धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून आजच्या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं. आणि यम दिप दान असेही म्हटले जाते.
                        आजची ही धनत्रयोदशी आपणा सर्वांना आनंद देऊन धनधान्य, सुख समृद्धी, प्रदान करो एवढीच प्रार्थना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★