दिवाळी सप्ताह : भाग -०२

एक आठवण दिवाळीची....

                 🖋️ लेखन ओंकार जगदेव वाडकर 


               एक वेळ अशी होती की भल्या पहाटे थंडीच्या कडाक्याने दातावर दात आपटत उठावं लागायचं आणि थंड गार तेल आणि सुगंधी ऊठण अंगाला लावून अभ्यंस्नान करावे लागायचे आणि त्यावेळी कारीट पायाखाली फोडावे लागायचे ही एक परंपरा आहे. पुढे तयार होऊन औक्षण करून घ्यायचं आणि फराळाला बसायचं किंवा हातात त्याच थंडीमध्ये एक अगरबत्ती घेऊन बाहेर पडायचं. फटाका फुटणार याच भितीनं तो वाजायच्या आधीच जीव मेटाकुटीला यायचा. बऱ्याच वेळा त्या अंधारात गुडूप होऊन तो फटाका कधी फुटायचा हे कळायचच नाही. आणि डोळ्यासमोर त्या फटाक्यांचा प्रकाश पसरायचा आणि कानाच्या पडद्या पर्यंत तो आवाज घुमत राहायचा. शेजारी पाजारी बोलत बसायचे, आपापसांत चांगल्या गप्पा रंगायच्या अन् एकमेकांकडे फराळाचं खास आकर्षण असायचं. प्रत्येकाचा आवडता पदार्थ म्हटला तर लाडू आणि कुरकुरीत तिखट अशी चकली फारशी प्रचलित आहे. एकोपा जपून साजरा होणारा दिवाळीचा सण हा खेड्या गावात आज ही पाहायला मिळतोच. तब्बल आठ ते पंधरा दिवस शाळेला सुट्टी मिळायची आणि त्या आनंदात मन गहिवरून जायचं. आत्ता शाळेला सुट्टी म्हटलं की, कुणाला नाही आवडत.
                त्या वेळी चार मित्र एकत्र करून खोट्या बंदुकीने चोर पोलिस खेळण्यात वेगळीच मज्जा होती. आणि बॉम्ब म्हणून आपटी बार फोडायचे आणि मोठ्यानं ओरडायच पोलिसांच्या हवाली करा. हा खेळ होता खरा पण, आज ही ती दिवाळीची आठवण ताजी आहे. ते गड किल्ले बांधण्यासाठी जमवलेली माती आणि ते दगड विटा आज ही त्या मेहनतीची आठवण करून देतात. आकार स्वरूप थोड फार ईकडे तिकडे व्हायचं पण, मनाला समजावून जायचं की किल्ला सुंदर बनवून झाला आहे. अख्खा दिवस तर त्या किल्ल्याला बघण्यात गुंग होऊन जायचा. 
                 संध्याकाळ झाली की, त्यावर तोरणं सोडून
ती रोषणाई बघतच राहावी असं वाटायचं. पुन्हा संध्याकाळी चक्र आणि पाऊस लाऊन मोठ मोठ्यानं ओरडत मज्जा करणं हा आनंद वेगळाच अनुभव देऊन गेला. भाऊबीजच्या दिवशी सुध्दा कुणा भाऊ बहिणीच गोड भाषेत पटलं असेल असं मला तरी नाही वाटत. घरी बहिणीकडून औक्षण करून घेतलं की जवळच्या बहिणीकडे जाऊन औक्षण करून घ्यायचं ही सुध्दा आठवण आज ही ताजीच आहे. चार पाहुणे लोक आली की त्यांच्या समवेत व्हरांड्यात बसून गप्पा रंगायच्या. खुप सारे किस्से आहेत की जे दिवाळी म्हटलं की सारे नजरे समोर ऊभे राहतात. आज ही दिवाळीच आहे पण ते क्षण थोडे दुरावले आहेत येवढाच फरक आहे तो आजच्या आणि त्या वेळीच्या दिवाळीमध्ये अखेर त्या क्षणांना एक आठवण दिवाळीची असं म्हणावंच लागेल.

          
                
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★